पुणेकरांनो लक्ष द्या! २१ नोव्हेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती…

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी श्रीक्षेत्र आळंदी येथील कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील हजारो वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आळंदीत दाखल होणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवण्यात आली होती.

याला आळा घालण्यासाठी काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात कार्तिकी वारीचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता आळंदी परिसरात तसेच पुणे शहरात वाहतुकीचा ताण वाढतो.
या परिस्थितीचा विचार करून वाहतूक विभागाने २१ नोव्हेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि नागरिकांना अनावश्यक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेतल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

तसेच पुणे वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी ते बोपखेल फाटा मार्गे आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या मार्गावरून जाणारी वाहने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण करत असल्यामुळे यावर्षी पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. जडवाहनांच्या हालचालीमुळे वारकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्याचा उद्देश यामागे आहे.
या बंदीच्या काळात ज्या वाहनांना विश्रांतवाडीकडून प्रवास करायचा आहे, त्यांनी येरवडा–खडकी–होळकर पूल–जुना मुंबई-पुणे मार्ग यांचा पर्यायी रूट म्हणून वापर करावा. नगर रस्त्याकडून येणाऱ्या वाहनांनी शिक्रापूरमार्गे चाकणकडे जाऊन पुढील प्रवास करावा, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिला आहे. याशिवाय नागर रोडवरून तुळापूर फाटा मार्गे आळंदी–मरकळकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही दुसरे पर्यायी मार्ग वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.