मुंबईकरांसाठी मोठी बातमी! लोकल संदर्भात महत्त्वाचा निर्णय, आता जीवघेणी गर्दी होणार कमी…

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेतील प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठं पाऊल उचललं आहे. वाढत्या प्रवासी ताणाचा विचार करून आता 15 डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

यासाठी दादर रेल्वे स्थानकात स्वतंत्र स्टॅबलिंग लाईन्स (उपमार्गिका) उभारण्यात येणार असून, यामुळे गाड्यांचे नियोजन अधिक प्रभावी होणार आहे. या निर्णयामुळे गर्दी कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर प्रामुख्याने बारा डब्यांच्या गाड्या धावत असल्याने पीक अवर्समध्ये प्रवाशांची मोठी गैरसोय होते. यावर उपाय म्हणून पंधरा डब्यांच्या गाड्या वाढवणे गरजेचे होते, परंतु त्यांच्या पार्किंगसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक सात आणि कल्याण येथील मालगाडी यार्डचाच आधार घ्यावा लागत होता. जागेच्या या अभावामुळे नवीन मोठ्या गाड्या ताफ्यात सामावून घेणे प्रशासनाला अत्यंत कठीण जात होते.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी दादरमध्ये उभारली जाणारी नवी उपमार्गिका अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या सुविधेमुळे गाड्या उभे करण्याची जागा उपलब्ध होईल आणि देखभाल दुरुस्तीची कामे तसेच वेळापत्रकाचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होईल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लवकरच एक नवीन पंधरा डब्यांची लोकल ताफ्यात दाखल होणार आहे. सध्या एकूण १,८२० फेऱ्यांपैकी पंधरा डब्यांच्या केवळ २२ (११ अप आणि ११ डाऊन) फेऱ्या होतात, मात्र या नव्या गाडीमुळे या फेऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.
पंधरा डब्यांची लोकल धावण्यासाठी केवळ गाड्या वाढवणे पुरेसे नसून फलाटांची लांबी देखील तितकीच आवश्यक असते. सध्या सीएसएमटी ते कल्याण दरम्यान चालणाऱ्या मोठ्या गाड्यांसाठी अनेक स्थानकांचे फलाट अपुरे पडतात. ही तांत्रिक अडचण कायमची दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल ३४ फलाटांची लांबी वाढवण्याचा महाप्रकल्प हाती घेतला आहे.
यामध्ये कोपर शहाड , मुंब्रा, कळवा , ठाकुर्ली आंबिवली, टिटवाळा, वासिंद, आसनगाव, आटगाव, कसारा, विठ्ठलवाडी, उल्हासनगर , अंबरनाथ, बदलापूर, शेलू, भिवपुरी , कर्जत, खोपोली आणि पळसदरी या स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.