अजित पवारांनी फसवणूक करुन राष्ट्रवादीच्या आमदारांची स्वाक्षरी घेतली, माजी मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

मुंबई : काल महाराष्ट्रात राजकीय घडामोडींनी धुरळा उडवून दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात आता तिसऱ्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची तसेच छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देण्याच्या तयारीत होते. जेथे शपथविधी सोहळा लवकरच होणार होता, तेथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात उपस्थित होते.
असे असताना यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. चव्हाण माध्यमांशी बोलत होते. अजित पवार यांच्या फुटीवर चव्हाण यांनी भुमिका स्पष्ट केली. स्वाक्षरी करण्यासाठी आमदारांना फसवले गेले, असे चव्हाण म्हणाले.
जनतेला गद्दारी अजिबात आवडत नाही. जे भाजपसोबत गेले आहेत. त्यांनी राजीनामे देवून निवडणुकीला सामोरे जावे. भाजप विरोधात महाविकास आघाडी कायम राहणार आहे. जे सोबत आहेत. त्यांना सोबत ताकदीने आम्ही भाजप विरोधात लढा देणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपण गेम चेंजर्स असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकावत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तूळात सुरु होती.
दादांनी पुन्हा मोठा राजकीय भुकंप केल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता येणाऱ्या काळात अजून काय घडामोडी घडणार हे लवकरच समजेल.