लग्नाच्या एका हट्टाने घेतला जीव! माजी सरपंचेचा गोठ्यात गळा आवळून खून; 500 किमी कारच्या डिक्कीत मृतदेह, भाच्याच्या एका फोनने उघड झाला थरार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने राज्यभर खळबळ उडाली आहे. शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे यांच्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासांत झाला असून, या प्रकरणात त्यांचे परिचित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक संबंध आणि लग्नाच्या मागणीवरून सुरू झालेला वाद अखेर निर्घृण हत्येत बदलला.
सुरेखा न्यारे यांच्या पतीचे सुमारे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर त्या प्रकाश पाटील यांच्या संपर्कात आल्या. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. मात्र, नात्याला अधिकृत स्वरूप देण्यासाठी सुरेखा यांनी वारंवार लग्नाची मागणी सुरू केली होती. या सततच्या आग्रहामुळे आरोपी अस्वस्थ झाला होता. या वादातून सुटका करण्यासाठी त्याने थेट खून करण्याचा निर्णय घेतल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे.

रविवार, 26 जुलै रोजी सकाळी आरोपीने सुरेखा न्यारे यांना शिरगाव परिसरातील एका म्हशीच्या गोठ्यात बोलावले. दोघांमध्ये पुन्हा लग्नाच्या विषयावर वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपीने संतापाच्या भरात त्यांचा गळा आवळून खून केला. घटना घडल्यानंतर त्याने मृतदेह गोणीत भरून स्वतःच्या चारचाकी वाहनाच्या डिक्कीत ठेवला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून परिसरातून निघून गेला.


हत्येनंतर पुरावे कायमचे नष्ट करण्यासाठी आरोपीने आणखी एक धक्कादायक योजना आखली. मृतदेह मुंबईजवळ समुद्रात फेकून देण्याचा त्याचा बेत होता. यासाठी त्याने रात्रीभर वाहन चालवत कोल्हापूरहून भिवंडीपर्यंत सुमारे 500 किलोमीटरचा प्रवास केला. भिवंडीत पोहोचल्यानंतर त्याने आपल्या भाच्याला संपूर्ण प्रकार सांगितला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत मागितली.
मात्र, मामाच्या तोंडून खुनाची कबुली ऐकताच भाचा हादरला. गुन्ह्यात सहभागी होण्याऐवजी त्याने थेट नारपोली पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. या एका फोनमुळे आरोपीचा संपूर्ण कट काही मिनिटांत उधळला.
माहिती मिळताच नारपोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित वाहनाचा शोध घेतला. वाहन अडवून तपासणी केली असता डिक्कीत गोणीत भरलेला सुरेखा न्यारे यांचा मृतदेह आढळला. हा प्रकार पाहून पोलिसही क्षणभर स्तब्ध झाले. आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यानंतर शाहूवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पुढील तपासासाठी दोन्ही पोलिस यंत्रणांनी समन्वय साधला.
या प्रकरणात घटनास्थळाची पाहणी, फॉरेन्सिक पुरावे, मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपीच्या हालचालींची माहिती गोळा केली जात आहे. हत्येपूर्वी दोघांमध्ये नेमके काय घडले, आरोपीने हा कट किती दिवसांपासून आखला होता आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आणखी कोणाची मदत घेतली होती का, याचाही तपास सुरू आहे.
माजी सरपंचेच्या निर्घृण हत्येमुळे शिरगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणातील प्रत्येक पैलूची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.