किरकोळ वादातून १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीलाच पेटवले अन् काही क्षणात…!! घटनेने राज्य हादरलं…

मुंबई : दिवसागणिक राज्यातील गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या राज्यात वेगात वाढले आहेत.

त्यातच आता ठाण्यात मैत्रीतील वादातून एका १७ वर्षीय मुलाने आपल्याच मैत्रिणीला पेटवून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

दरम्यान, या दुर्घटनेत पीडित मुलगी सुमारे ८० टक्के भाजली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर कापूरबावडी पोलिसांनी १७ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

या घटनेतील पीडित १७ वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसह ठाण्यातील कापूरबावडी परिसरात राहते. मात्र यापूर्वी ती कुटुंबासोबत मुंबईतील चेंबूर भागात वास्तव्यास होती. त्याचवेळी तिची ओळख चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका मुलाशी झाली. काही दिवसांपूर्वी मुलगी भाऊबीजेच्या निमित्ताने ती मुलगी पुन्हा चेंबूर येथे गेली होती.
त्यावेळी आरोपी मुलाने तिच्यासोबत वाद घातला. तिला मारहाण केली. मुलीच्या नातेवाईकांना ही माहिती मिळताच, ते तिला सोडवण्यासाठी गेले. त्यांनी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संतापलेल्या मुलाने मुलीला मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. या धमकीमुळे मुलगी प्रचंड घाबरली होती.
यानंतर २४ ऑक्टोबर रोजी पीडित मुलगी ठाण्यातील तिच्या घरामध्ये एकटी असताना अचानक घरातून धूर निघू लागला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ मुलीच्या आईला याची माहिती दिली. कुटुंबीय धावत घरी आले असता त्यांना तो मुलगा घरात दिसला, तर मुलगी भाजलेल्या अवस्थेत वेदनेने ओरडत होती. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबियांनी आरोपी मुलाला जाब विचारला असता, तो तेथून पळून गेला.
या घटनेनंतर मुलीच्या आईने कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत १७ वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०९ आणि ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी ८० टक्क्यांहून अधिक भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलगा आणि मुलगी एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात वाद झाला, यामुळे हे घडलं असावं, असा अंदाज पोलिसांना आहे. मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर घटनेचे नेमके कारण आणि संपूर्ण तपशील स्पष्ट होईल, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
