शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता पाऊस धो-धो कोसळणार, हवामान खात्याची माहिती..

मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. राज्यात आत्तापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या अजूनही १७ टक्के पाऊस कमी आहे.
त्यामुळे या आठवड्यातल्या पावसाकडे अधिक लक्ष आहे. कोकणात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बुधवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये भारतीय हवामान विभागाने रेड ॲलर्टही जारी केला आहे
तसेच कोकण विभागात या आठवडा अखेरीपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. रायगड परिसरात मंगळवारीही पावसाचा जोर कायम होता. मंगळवारी दुपारी पावसाचा इशारा अद्ययावत करून रायगडसाठी रेड ॲलर्ट देण्यात आल आहे.
बुधवारसाठी पालघर, रायगड, पुणे, सातारा येथील घाट परिसरात तुरळक ठिकाणी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाण्यातही सकाळच्या वेळेत मुसळधार पावसाची नोंद झाली. मुंबईत मंगळवार सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ११९, तर कुलाबा येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
दहिसर येथे ९३, राम मंदिर येथे ८२.५, चेंबूर येथे ७०.५, विद्याविहार येथे १०६.५, भायखळा येथे ८१, सीएसएमटी येथे १११, तर सायन येथे ९१ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. आज, बुधवारसाठीही मुंबईत ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. ठाणे येथेही काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.