पुरंदर किल्ल्यावर जाण्याचा प्लॅन आहे? ‘या’ १९ दिवस पर्यटकांना नो एंट्री; प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याला भेट देण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुरंदर किल्ला परिसरात प्रशासनाकडून २२ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत पूर्णपणे प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. सेना प्रशिक्षण केंद्र, पुरंदर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत पर्यटकांना किल्ल्यावर जाता येणार नाही.
अचानक प्रवेशबंदी का?

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या तात्पुरत्या प्रवेशबंदीमागे सुरक्षेसह अनेक महत्त्वाची कारणे आहेत. किल्ले परिसरातील घाट आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. तसेच, पुरंदर किल्ला परिसर वन्यजीव विभागाच्या ‘कोर झोन’मध्ये येतो. वाढत्या अनियंत्रित गर्दीमुळे परिसरातील निसर्ग आणि जैवविविधतेला हानी पोहोचू नये, यासाठीही ही खबरदारी घेण्यात आली आहे.


सुरक्षा व्यवस्थेवर वाढला ताण
पुरंदर किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही ताण येत होता. तसेच, परिसरात लष्करी प्रशिक्षण सुरू असल्याने प्रशिक्षण क्षेत्राची सुरक्षा अबाधित ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या कालावधीत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
१८ दिवस पर्यटकांसाठी किल्ला बंद
मंगळवार, २२ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही प्रवेशबंदी १० ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे पर्यटक, दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांनी या कालावधीत पुरंदर किल्ल्याची भेट नियोजित करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.