उद्धव ठाकरेंचा भागवतांना थेट सवाल; “Gen-Z शी बोलण्याआधी शाहांचा राजीनामा का नाही?”

मुंबई : Gen-Z आणि सरकारमधील वाढता संघर्ष, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सुरू असलेले राजकारण आणि शिवसेना पक्ष-चिन्हाच्या न्यायालयीन लढाईच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या तरुणांशी झालेल्या संवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मोहन भागवत यांनी नुकताच Gen-Z आणि Gen-Alpha मधील तरुणांशी संवाद साधत आंदोलकांना केवळ आंदोलन करत आहेत म्हणून देशविरोधी ठरवू नये, असे आवाहन केले होते. तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भागवतांना लक्ष्य केले. “Gen-Z शी संवाद साधण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्यायला हवा होता,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

देशातील तरुण आता सरकारला प्रश्न विचारत आहेत. फसवणुकीचे दिवस संपले असून ‘अच्छे दिन’ची वाट पाहता पाहता वाईट दिवस आले आहेत, असा दावा ठाकरे यांनी केला. तरुणांच्या नाराजीमागची कारणे समजून घेण्याऐवजी केवळ त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून प्रश्न सुटणार नाहीत, असेही त्यांनी सूचित केले.


यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय भेटींवरही निशाणा साधला. काही नेत्यांना भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ आहे, मात्र आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ नाही, असा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांनी तरुणांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरही उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. गेल्या चार वर्षांपासून निकालाची प्रतीक्षा असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. पक्षाची घटना उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असेल तर ती आमच्याकडून मागवता आली असती, असे ते म्हणाले. सध्या या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू असून संविधानाच्या चौकटीत आणि कोणावरही अन्याय न करणारा निर्णय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याच मुद्द्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ‘गद्दारी’च्या राजकारणाचा आरोप केला. इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या बाजूने घेऊन त्यांना संरक्षण देण्याचा संदेश दिला जात असल्याचा दावा करत हा प्रकार केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नसल्याचे त्यांनी म्हटले. “गद्दारीचा हा व्हायरस देशभर पसरत आहे,” असा आरोप करत लोकशाहीसाठी सर्वांनी एकत्र लढण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.
“भिऊ नका” हा संदेश नेमका कुणासाठी आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हा संदेश अमित शाह, देवेंद्र फडणवीस की न्यायालयासाठी आहे, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. देशातील तरुणांमध्ये मोठा असंतोष असून केवळ राजकीय डावपेचांनी त्यांचा आवाज दाबता येणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
Gen-Z आंदोलनावरून भागवतांचा संवादाचा सूर आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी केलेली टीका यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एकीकडे तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विरोधकांकडून थेट केंद्र सरकारच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हे आहेत.