मोठी बातमी! NEET पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक; 26 जुलैला मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा

मुंबई : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 26 जुलै रोजी मुंबईत संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे. NEET पेपरफुटी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
या आंदोलनात महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांसह विविध विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनाही सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने गांभीर्याने भूमिका घ्यावी आणि त्यांच्याशी थेट संवाद साधावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज ठाकरे म्हणाले, “26 जुलै रोजी विद्यार्थ्यांसोबत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्यांचा संताप आणि भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.”


हा मोर्चा शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा काढण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “सिद्धिविनायकाच्या चरणी सरकारला सुबुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करून मोर्चाची सांगता केली जाईल.”
यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका करत शेतकरी आंदोलन, मणिपूर हिंसाचार आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. “NEET परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण आहे. मी याबाबत पूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इशारा दिला होता. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, उद्या विद्यार्थीही टोकाचे पाऊल उचलतील, अशी भीती मी व्यक्त केली होती,” असे ते म्हणाले.
मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले, “त्या वेळी जबाबदारी स्वीकारावी लागली होती. मग NEET पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणातही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. ही केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बाब राहिलेली नाही; आता प्रश्न थेट केंद्र सरकारच्या उत्तरदायित्वाचा आहे.”
विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलावून त्यांचे प्रश्न ऐकले असते, तर परिस्थिती एवढी चिघळली नसती, असा दावा करत त्यांनी केंद्र सरकारवर संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप केला. 26 जुलै रोजी होणाऱ्या या संयुक्त मोर्चाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळासह विद्यार्थ्यांचेही लक्ष लागले आहे.