‘दिल्लीतील लाठीमारानंतर अण्णांचा एल्गार! ‘नगरचे जंतर-मंतर’वर दोन तासांचे मौन आंदोलन; सरकारची वाढली धडधड

अहिल्यानगर : NEET पेपर लीक प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेला संताप आता आणखी तीव्र होत आहे. नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जनंतर विविध स्तरांतून निषेध व्यक्त केला जात असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांनंतर अण्णा पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर येत असल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अण्णा हजारे गुरुवारी (23 जुलै) सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत अहिल्यानगरातील वाडिया पार्क येथील गांधी स्मारक परिसरात दोन तासांचे मौन आंदोलन करणार आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदवत सरकारने विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्या समजून घ्याव्यात आणि न्याय्य तोडगा काढावा, अशी त्यांची भूमिका आहे. लोकशाहीमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करण्यापेक्षा संवादाला प्राधान्य दिले पाहिजे, असा संदेशही ते या आंदोलनातून देणार आहेत.

दिल्लीतील आंदोलनानंतर विरोधी पक्षांसह अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाईमुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शहरांत निषेध आंदोलने सुरू आहेत. अशा परिस्थितीत अण्णा हजारे यांनी घेतलेली भूमिका आंदोलनाला नवी ऊर्जा देणारी मानली जात आहे.

विशेष म्हणजे, आंदोलनाचे ठिकाण असलेल्या वाडिया पार्कला ‘नगरचे जंतर-मंतर’ अशी प्रतीकात्मक ओळख दिली जाणार आहे. या ठिकाणी विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे आंदोलन राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरण्याची चिन्हे आहेत.


भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन आणि लोकपाल विधेयकासाठी दिल्लीत ऐतिहासिक लढा उभारणारे अण्णा हजारे गेल्या काही वर्षांत मोठ्या आंदोलनांपासून दूर होते. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या संवेदनशील मुद्द्यावर त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अण्णांच्या मौन आंदोलनानंतर सरकारकडून कोणती प्रतिक्रिया येते, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चेचा मार्ग मोकळा होतो का आणि या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. NEET प्रकरणातील पुढील घडामोडींवर अण्णांच्या भूमिकेचा प्रभाव पडण्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
