‘खाटू श्याम’च्या नावावर आखला होता कट? केतन अग्रवाल हत्या प्रकरणात राजस्थानपर्यंत धावलेल्या पोलिसांनाही लागला नाही पुरावा; आईची मोदींकडे आर्त हाक

पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या हत्येमागील कथित कटाचे नवे पैलू समोर येत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासादरम्यान उघड झालेल्या एका महत्त्वाच्या दुव्याचा माग घेत थेट राजस्थान गाठले. मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात गुप्तपणे विवाह केल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. या विवाहाचा तपासातील घटनांशी काही संबंध आहे का, हे पडताळण्यासाठी विशेष पथक मंदिरात दाखल झाले. मात्र, अनेक दिवसांच्या तपासानंतरही पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागला नाही.

तपास पथकाने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित कालावधीतील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. शेकडो तासांचे रेकॉर्डिंग पाहण्यात आले, मंदिरातील नोंदींचीही पडताळणी करण्यात आली. मात्र, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी तेथे विवाह केल्याचे सिद्ध करणारा एकही पुरावा समोर आला नाही. त्यामुळे कथित गुप्त विवाहाची चर्चा खरी की दिशाभूल करणारी, याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. आता पोलिस या माहितीचा स्रोत आणि त्यामागील सत्य शोधण्यावर भर देत आहेत.
दरम्यान, या दुहेरी तपासाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची कोठडी गुरुवारी संपत असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपास अद्याप अपूर्ण असल्याने पोलिसांकडून पुढील कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कथित विवाहाचा तपास हा या हत्येतील हेतू आणि आरोपींच्या परस्पर संबंधांचा महत्त्वाचा भाग असल्याचे तपास यंत्रणेकडून मानले जात आहे.

या प्रकरणाने केतन अग्रवाल यांच्या कुटुंबालाही पूर्णपणे हादरवून सोडले आहे. मुलाच्या हत्येनंतर न्यायासाठी लढणाऱ्या केतन यांच्या आई राखी अग्रवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावनिक पत्र लिहिले आहे. “माझ्या मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. त्याच्याशिवाय आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. घरातील प्रत्येक वस्तू त्याची आठवण करून देते. त्याच्या हास्याने भरलेलं घर आज शांततेने व्यापलं आहे. या प्रकरणात मला न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि यासाठी आपण वैयक्तिक लक्ष द्यावे,” अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे.

राजस्थानमधील तपासानंतरही महत्त्वाचा पुरावा न मिळाल्याने केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील रहस्य अधिकच गडद झाले आहे. आता न्यायालयातील पुढील सुनावणी, पोलिसांचा पुढील तपास आणि कथित गुप्त विवाहामागील सत्य उघड होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.