मान्सूनचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; तुमच्या भागात पाऊस कधी बरसणार? जाणून घ्या तारीख..

पुणे : राज्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा अखेर संपली असून, कोकणातील काही भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप मान्सूनचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नसल्याने राज्यातील अनेक भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या मान्सून दक्षिण कोकणासह सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत तो राज्याच्या आणखी भागांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 10 जून रोजी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 11 जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यांमध्येही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून, 10 जून रोजी येथे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 12 जून रोजी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

खान्देशातील नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये 11 ते 18 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये 12 ते 15 जून या कालावधीत पाऊस पडू शकतो. विदर्भातील नागपूर आणि आसपासच्या भागात 15 ते 16 जून रोजी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, संबंधित सर्व जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूरमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज असून, पालघरमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस ढगाळ वातावरण, उकाडा आणि उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.