देवगिरीवर राजकीय खलबते! एक आमदार, एक मंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादीत दोन मोठे निर्णय?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यसभेच्या जागेवरून निर्माण झालेला पेच अखेर सोडवण्यात आला असला, तरी आता पक्षात आणखी काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आज देवगिरी बंगल्यावर घडणाऱ्या बैठकींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यसभा उमेदवारीच्या चर्चेदरम्यान छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. मात्र अखेर पक्षाने राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज आमदार इद्रीस नाईकवाडी आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
इद्रीस नाईकवाडी हे देवगिरी निवासस्थानी दाखल झाले असून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही देवगिरी बंगल्यावर पोहोचल्याने या बैठकीचे महत्त्व वाढले आहे.

दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचीही सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मंत्रिपदाबाबत किंवा पक्षातील जबाबदाऱ्यांबाबत काही महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

दरम्यान, आगामी एनडीए बैठकीच्या पार्श्वभूमीवरही सुनेत्रा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य आणि केंद्रातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, तसेच राष्ट्रवादीच्या वाट्याच्या रिक्त मंत्रिपदांबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
त्यामुळे आज देवगिरी बंगल्यावर होणाऱ्या बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वाचे राजकीय निर्णय जाहीर होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.