सोरतापवाडीत हॉटेल भाड्यापोटी झालेल्या मारहाण प्रकरण; हॉटेल मालक व भाडेकरू यांच्यावर परस्पर मारहाणीचे गुन्हे दाखल…


उरुळी कांचन : हॉटेल भाड्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल चालक आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून हॉटेल मालकाला आणि त्यांच्या भावाला लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल केला आहे. हि घटना सोमवारी (ता.11) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत अजित अनिल कड (वय 29, व्यवसाय शेती रा. कडवस्ती, सोरतापवाडी ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित हरी चोपडे, संचित हरी चोपडे, सुरज कल्याण शिंदे, मयुरी सुरज शिंदे (रा. म्हातोबाची आळंदी, मगर वस्ती ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित कड यांचे ‘हॉटेल गावकरी’ हे आरोपी सुमित चोपडे याला भाडेतत्त्वावर चालवण्यास दिले आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडीतील पुरोगामी माध्यमिक विद्यालयाजवळ असलेल्या ‘हॉटेल राधेकृष्ण’ समोर अजित कड यांनी हॉटेलचे थकीत भाडे मागितले.

हॉटेलचे भाडे मागितल्याचा राग मनात धरून आरोपी सुमित चोपडे आणि संचित चोपडे यांनी अजित कड आणि त्यांचा चुलत भाऊ यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या सुरज शिंदे आणि मयुरी शिंदे यांनी हाताने मारहाण करत दगडी खडी मारून शिवीगाळ केली. “तुला जिवे मारून टाकीन,” अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अजित कड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पहिल्या घटनेत फिर्यादी सुमित हरी चोपडे (वय-28 वर्ष व्यवसाय-हॉटेल व्यवसाय रा. आळंदी म्हातोबा, ता. हवेली) हे कुटुंबीयासमवेत वाढदिवस साजरा करत असताना जुन्या वादातून आणि फोनवरील शिवीगाळीवरून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला सहा जणांनी मिळून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे.

याप्रकरणी चोपडे यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद आली. त्यानुसार चोपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय अनिल कड, अजित अनिल कड, अजित संपत कड, प्रकाश बेलवाल, अनिकेत नितीन चौधरी, अंकिता अक्षय कड (सर्व रा. कडवस्ती, सोरतापवाडी ता. हवेली) यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुमित चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९० आणि १९१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेत दोन्ही बाजूने परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात एकूण 10 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!