‘तुम तो ठहरे परदेसी’ गीतकार जहीर आलम यांचं निधन, नागपुरात घेतला अखेरचा श्वास…


नागपूर : नव्वदच्या दशकात तरुणाईला वेड लावणाऱ्या ‘तुम तो ठहरे परदेसी’ या अजरामर गीताचे रचनाकार जहीर आलम यांनी रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. नागपुरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या जाण्याने साहित्य आणि कला विश्वावर शोककळा पसरली असून, काळाच्या पडद्याआड गेलेला एक अमूल्य हिरा आज आपण गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

सुरुवातीच्या काळात हे गीत केवळ स्थानिक स्तरावर गायले जायचे. परंतु, जेव्हा सुप्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांनी हे गाणे त्यांच्या अनोख्या शैलीत गायले, तेव्हा ते रातोरात देशभरात तुफान लोकप्रिय झाले. या एका गाण्याने अल्ताफ राजा यांना एका रात्रीत सुपरस्टार बनवले, तसेच संबंधित म्युझिक कंपनीलाही मोठा आर्थिक फायदा मिळवून दिला.

या गीताची भुरळ इतकी होती की, ९० च्या दशकात गल्लीबोळातील पानटपऱ्या, हॉटेल्स आणि बस स्थानकांवर फक्त हेच गाणे ऐकू येत असे. एवढेच नव्हे तर, त्या काळातील शाळा आणि महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांमध्येही तरुण-तरुणी याच गाण्यावर ठेका धरताना दिसायचे. आजही या गीताचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे.

ज्या शब्दांनी इतरांना अमाप पैसा आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले, त्या शब्दांचे जन्मदाते मात्र आयुष्यभर उपेक्षितच राहिले. जहीर आलम हे शहरातील मोमीनपुरा परिसरातील एका अतिशय लहानशा घरात आपले जीवन व्यतीत करत होते. या प्रचंड लोकप्रियतेचा कोणताही आर्थिक लाभ किंवा सन्मान त्यांच्या पदरात कधीच पडला नाही, उलट त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि संघर्षातच गेले.

संसाराचा गाडा हाकण्यासाठी ते सुरुवातीला एम्प्रेस मिल येथे नोकरी करत होते. पण दुर्दैवाने ती मिलही बंद पडली आणि त्यांच्यासमोरील आर्थिक संकटाचा डोंगर आणखी वाढला. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्याच शहरातील लोक त्यांना विसरले होते.

त्यांच्या निधनानंतर आता सांस्कृतिक वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात असून, एवढा मोठा इतिहास रचणाऱ्या या कलावंताला योग्य न्याय मिळाला नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!