थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ

लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाची महत्वकांक्षी योजना असलेल्या व महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत थेऊर मंडल भागात आयोजित करण्यात आलेल्या भव्य “महाराजस्व समाधान शिबिराला” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. थेऊरफाटा- थेऊर रोडवरील आशिर्वाद बॅक्वेट हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे आयोजन पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

काकडे यांनी या उपक्रमासाठी विशेष पाठपुरावा करत विविध विभागांना एकत्र आणले. नागरिकांच्या समस्या एकाच छताखाली जलद गतीने सोडविणे शक्य झाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे शासकीय अडथळे दूर करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत शिबिराचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.
थेऊर, कोलवडी, साष्टे, कुंजीरवाडी आणि मांजरी बु. या गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शिबिरात महसूल, पोलीस, कृषी, आरोग्य, भूमी अभिलेख, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण अर्थसहाय्य, वन विभाग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, निवासी दाखले, सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंद, ई-मोजणी, तुकडेबंदी नियमितीकरण, पीएम किसान, नमो किसान, संजय गांधी निराधार, दिव्यांग योजना तसेच ग्रामपंचायत करसंबंधित प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करण्यात आले. अनेक प्रकरणांचा जागीच निपटारा करण्यात आला. तसेच काही लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, लोणी काळभोर अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, अतिरिक्त गटविकास अधिकारी शिवाजी नागवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर, जि. प. सदस्या शितल सुजित कांबळे, सुरेखा रमेश हरगुडे, संदेश आव्हाळे, दिलीप वाल्हेकर, पंचायत समिती उपसभापती विद्याताई गायकवाड, सदस्य कुशाल सातव, कृषिराज चौधरी, सुदर्शन चौधरी, अमोल टेकाळे, कोमल गणेश कांबळे, सुषमा मुरकुटे, राणी वाळके यांच्यासह महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, आजी माजी पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत वेगाने पोहोचत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन व्हावे, अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
