गृहनिर्माण संकुलात कचरा प्रक्रिया केंद्र व कचरा विलगीकरण कामात आता होणार ऑडिट; कचऱ्यावर प्रक्रिया नसल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करणार दंडात्मक कारवाई…


पुणे: “राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र व कचरा विलगीकरणाचे ऑडिट केले जाणार आणि दोषींवर कारवाई केली जाणार.”..महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे प्रतिपादन..

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलातील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा व गृहनिर्माण संकुलातील कचरा विलगीकरण याचे ऑडिट केले जात असून दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल अशी घोषणा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम हे आज पुणे येथे केली.

प्लास्टिक रिसायकलिंग शो इंडिया आणि भारत रिसायकलिंग शो यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिसायकलिंग व्हिजन सिरीज 2026 या परिषदेसाठी सिद्धेश कदम प्रमुख पाहुणे उपस्थित होते .यावेळी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची प्रदूषण नियंत्रणाबाबत भूमिका स्पष्ट केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या गृह निर्माण संकुलातील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे नियमित चालवली जातात की नाही. त्याचबरोबर या गृह संकुलातील कचरा विलगीकरण केले जात आहे अथवा नाही याची पडताळणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यस्तरीय ऑडिट केले जात आहे. राज्यातील मोठ्या शहरांपासून ते छोट्या शहरांपर्यंत सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न हा जल प्रदूषण करण्यास कारणीभूत ठरत आहे तर कचरा विलगीकरण न केल्याने मातीचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.

म्हणून केंद्र शासनाच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या गृहनिर्माण संकुलात अशी यंत्रणा कार्यान्वित आहे तिचे पालन केले जात नसेल तर त्यावर दंडात्मक कारवाई करून प्रदूषण नियंत्रणाकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आग्रही पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादन त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.

पुणे शहरातील आरएमसी प्लांटची देखील अशाच पद्धतीने तपासणी करण्यात येणार असून आर एम सी प्लांट च्या माध्यमातून हवा प्रदूषण होणार नाही याकरता आरएमसी प्लांट उद्योगांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि ती मंडळांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी आरएमसी प्लांट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना केले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण नियंत्रणासाठी फक्त दंडात्मक कारवाई करण्यावरच भर देत नसून याबाबत राज्यातील औद्योगिक आस्थापना, स्थानिक स्वराज्य संस्था योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच तत्परता दाखवत असते याचा देखील पुनरुच्चार आज सिद्धेश कदम यांनी केला.

प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन 2026 या निमित्ताने राज्यभरात मुंबई, पुणे , नाशिक, नागपूर , आणि रत्नागिरी अशा शहरात प्लास्टिक रिसायकलिंग व्हिजन परिषदा भरवण्यात येणार असून वेस्ट रिसायकलिंग च्या माध्यमातून सर्क्युलर इकॉनॉमी ला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि यात नवउद्योजक तरुणांचा लक्षणीय वाढता सहभाग असेल असा विश्वास देखील त्यांनी या परिषदेच्या निमित्ताने व्यक्त केला.

पुणे शहरातील मुळा मुठा नदीच्या एका टप्प्याचे तांत्रिक सर्वेक्षण हे न्यायालयीन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महानगरपालिका आणि जलसंधारण विभाग संयुक्तपणे करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण नियंत्रणासाठी धोरणात्मक कामकाज करीत असून त्या साठी लोक सहभाग देखील महत्त्वाचा असल्याचं सिद्धेश कदम यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!