सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर! जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनास आदेश…

पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दूरध्वनीवरून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची सविस्तर माहिती घेत तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, जोरदार वारा आणि काही ठिकाणी गारपिटीसह झालेल्या पावसामुळे काढणीस आलेला गहू, ज्वारी यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचा मोहर गळून पडला असून द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
या परिस्थितीत नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
