“नागपूर स्फोटात कामगारांचा बळी गेला तो हलगर्जीपणा नसून प्रशासकीय अन् मालकांच्या….”; विजय वडेट्टीवारांचा आरोप

नागपूर: गेल्या काही दिवसापूर्वी नागपूर येथील एसबीएल कंपनीत मोठा भीषण स्फोट झाला. यामध्ये आत्तापर्यंत 22 निष्पाप कामगारांचा बळी गेला. यावरून आता काँग्रेस विधिमंडळ नेते विजय,वडेट्टीवार यांनी विधानसभेत मोठा आरोप केला आहे.कामगारांचा बळी गेला, तो हलगर्जीपणा नसून प्रशासकीय आणि मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ आहे,असा आरोप त्यांनी केला आहे.

विधानसभेत नागपूर येथील कंपनीतील स्फ़ोट प्रकरणावर लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. या प्रकरणातील एफ आय आर मधील त्रुटी आणि सुरक्षा नियमांच्या पायमल्लीवरून त्यांनी सरकारला देखील धारेवर धरले.यावर बोलताना वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, ज्या घटनेत 22 लोकांचा जीव गेला, त्या घटनेच्या एफआयआरमध्ये अशी कलमे का लावली गेली ज्यामुळे आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळेल? मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला गेला नाही? हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
दरम्यान, मंत्र्यांनी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संबंधित सुरक्षा निरीक्षक आणि पेसो अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना सहआरोपी करावे. स्फोटकांचा प्रत्यक्ष साठा आणि परवानगी यांचा ताळमेळ तपासावा. अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

तसेच या कंपनीच्या प्राथमिक चौकशीत आलेल्या धक्कादायक बाबींचा उलगडा केला. ते म्हणाले,कंपनीत फायर पंप नव्हते, रिस्क असेसमेंट केले नव्हते. नियमानुसार दोन सेफ्टी ऑफिसर हवे असताना फक्त एकच होता. कंपनीत सीसीटीव्ही नव्हते आणि इंटरनल सेफ्टी ऑडिटची कोणतीही नोंद नसल्याचा उल्लेख त्यांनी सभागृहात करून दाखवला.