भाजपकडून 9 राज्यसभा उमेदवारांची घोषणा ; महाराष्ट्रातील नावाबाबत सस्पेन्स कायम, उमेदवारीची उस्तुकता शिगेला….

मुंबई : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनाही उमेदवारी दिली आहे. मात्र महाराष्ट्रातून उमेदवार कोण असतील याबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यात उत्सुकता कायम आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे तर मतदान १५ मार्च रोजी होणार आहे. मतमोजणीही त्याच दिवशी होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून मोठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. सहा राज्यातून नऊ उमेदवारांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. यामध्ये बिहार मधून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच माजी आमदार शिवेश कुमार, हरियाणा मधून माजी खासदार संजय भाटिया,छत्तीसगड मधून भाजप प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मी वर्मा,पश्चिम बंगाल मधून माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा, आसाममधून राज्य सरकारमधील मंत्री जोगेन मोहन, माजी आमदार तेराश गोवाला,ओडिशा मधून प्रदेशाध्यक्ष मनमोहन शामल आणि खासदार सुजित कुमार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

या राज्यसभा निवडणुकीसाठी या नऊ नावांची घोषणा करण्यात आली असली तरी महाराष्ट्राचा उमेदवार कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे. भाजपकडून सस्पेन्स ठेवण्यात आला असल्याने या नावाबाबतचे उत्सुकता शिगेला पोचली आहे.