सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीचा’ वस्ताद ‘पुन्हा मैदानात, शरद पवारांच्या नावावर मविआकडून शिक्कामोर्तब..

मुंबई: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले असतानाही राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती.अखेर आता महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटांन या जागेवरील दावा सोडला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार रिंगणात उतरणार आहेत.

महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्राच्या सात जागांसाठीची अधिसूचना 26 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होत नव्हता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.या भेटीत चर्चेअंती शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यसभेच्या या सातव्या जागेसाठी महायुती ही आग्रही होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार जर उमेदवार नसतील तर भारतीय जनता पक्ष सातव्या जागेवरही आपला उमेदवार देऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीने सातव्या जागेबद्दल अधिक धोका न पत्करता शरद पवारच उमेदवार असायला हवेत, अशी चर्चेही बैठकीत झाल्याची माहिती आहे.

राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी आम्ही सर्वांनी मिळून शरद पवार यांना आग्रह केला आहे. त्यांनी पुन्हा राज्यसभेवर जावे असं राष्ट्रवादी पक्षाचे नेते जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अखेर महाविकास आघाडीच्या राज्यसभेच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.