समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! वाहतूक राहणार बंद, नेमकं कारण काय?

पुणे : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा जलद प्रवास अधिक सुरक्षित राहावा यासाठी समृद्धी महामार्गावर महत्त्वाची देखभाल व तांत्रिक तपासणीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामांमुळे ९ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत काही ठरावीक वेळांसाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी या काळात प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याची गरज आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर ९ ते १३ जानेवारीदरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत एकूण १० टप्प्यांमध्ये काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ही वाहतूक बंदी प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुका, चांदूर रेल्वे परिसर तसेच नांदगाव खंडेश्वर भागात लागू असणार आहे. या कालावधीत महामार्गावर तांत्रिक तपासणी, संरचनात्मक देखभाल आणि सुरक्षिततेशी संबंधित कामे केली जाणार आहेत.

त्यामुळे काही विशिष्ट साखळी क्रमांकांवर ठरावीक वेळेत दोन्ही दिशेची वाहतूक थांबवणे आवश्यक ठरले आहे. प्रशासनाच्या मते, ही कामे पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल.
९ जानेवारी रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड गावाजवळ साखळी क्रमांक १२०.३००० तसेच धोत्रा गावाजवळ साखळी क्रमांक १२५.४०० येथे मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १० जानेवारी रोजी खंबाळा (गावाजवळील साखळी क्रमांक १३०.४०० येथे मुंबई वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते १ या वेळेत थांबवली जाणार आहे.
दरम्यान, १२ जानेवारी रोजी चांदूर रेल्वे तालुक्यातील शहापूर खेकडी गावाजवळ साखळी क्रमांक १४५.२०० येथे नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी ३ ते ४ या वेळेत बंद राहणार आहे. याच दिवशी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पाचोड गावाजवळील साखळी क्रमांक १४०.५०० येथेही नागपूर वाहिनीवरील वाहतूक त्याच वेळेत थांबवण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग..
१३ जानेवारी रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील देऊळगाव परिसरातील साखळी क्रमांक १५०.३०० येथे मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते १ या वेळेत बंद राहील. त्याच दिवशी शहापूर खेकडी गावाजवळील साखळी क्रमांक १४५.२०० येथेही मुंबई वाहिनीवरील वाहतूक याच कालावधीत पूर्णतः थांबवली जाणार आहे