रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी! धान्य वाटपाच्या नियमात मोठा बदल, जाणून घ्या..

पुणे : नववर्षाच्या सुरुवातीपासूनच राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय लागू करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२६ पासून स्वस्त धान्य दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वितरण पद्धतीत बदल करण्यात आले असून, याचा थेट परिणाम लाखो लाभार्थ्यांवर होणार आहे.

तसेच या नव्या निर्णयानुसार गव्हाच्या वाटपात वाढ करण्यात आली असून तांदळाच्या कोट्यात कपात करण्यात आली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आहारातील बदल, उपलब्ध धान्य साठा आणि ग्राहकांच्या मागणीचा विचार करत हे बदल लागू केले आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, स्वस्त धान्य दुकानांमध्ये लाभार्थ्यांना नव्या पद्धतीनुसार धान्य दिले जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून शिधापत्रिकाधारकांकडून गव्हाच्या कोट्यात वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती.

विशेषतः शहरी भागात तांदळाच्या तुलनेत गव्हाचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर शासनाने गव्हाच्या वाटपात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र त्याचवेळी तांदळाच्या कोट्यात कपात करण्यात आल्याने काही लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागात तांदूळ हा मुख्य अन्नघटक असल्याने या बदलांचा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंत्योदय अन्न योजना अंतर्गत येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या धान्य वितरणातही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी या कार्डधारकांना दरमहा १५ किलो तांदूळ आणि २० किलो गहू दिला जात होता. नव्या नियमानुसार गव्हाचे प्रमाण वाढवण्यात येणार असून तांदळाचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. मात्र बराच काळ बंद असलेले साखरेचे वितरण पुन्हा सुरू करण्यात आल्याने अंत्योदय लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.