महायुतीत पॅचअप ; एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर ‘त्या’ आदेशाची चर्चा, मित्रपक्षातील प्रवेशांना ब्रेक लागणार?

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीतील वाढत्या पक्षांतरामुळे युतीतील संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली.यावेळी त्यांनी दिल्लीत अमित शाहांना भेटून भाजपनेत्यांविरोधात तक्रार केली. या चर्चेनंतर शिंदेंनी मित्रपक्षांमधून आपल्या पक्षात येणारे संभाव्य प्रवेश तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता महायुतीतील मित्र पक्षातील प्रवेशांना ब्रेक लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण ठरला. त्यावेळी त्यांनी मंत्री अमित शहांची भेट घेत जवळपास 50 मिनिटं त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे, महायुती धर्म कसा पाळायला हवा, त्याचा किती परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होईल, हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं. त्यानंतर मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश सध्या रोखा असे आदेशच शिंदे यांनी शिवसेनेचे मंत्री व पदाधिकाऱ्यांना दिले.या दिल्लीवारीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे आदेश दिले असून त्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.
त्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेने मित्रपक्षातील काही पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनिती आखली होती. येत्या 22 तारखेला मित्र पक्षाती, विशेषत: भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळं आता महायुतीत पॅचअप झालं का, मित्रप्रवेशातील प्रवेश आणि एकंदर इनकमिंग थांबणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
