पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक कोंडीला रिंगरोडच ठरणार आधार! उन्नत मार्गाच्या कामाला रिंगरोडच पर्याय; वाहतुक कोंडीने शहर व पूर्व हवेलीकर झाले बेहाल…

जयदिप जाधव

उरुळीकांचन : पुणे शहराला जोडणाऱ्या पुणे- सोलापूर व पुणे – अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गांची वाहतुक कोंडीची आवस्था अतिशय बिकट झाली आहे. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर उन्नत मार्गांची मंजुरी मिळाली असली तरी कामाला लागणारा वेळ तसेच पर्यायी वाहतुकीचा मुद्दा अतिशय कठीण होऊन बसल्याने उन्नत मार्ग विकसित होण्यापूर्वीच पूर्व हवेलीतून जाणाऱ्या रिंगरोडच्या कामाला गती मिळणे आवश्यक झाले असून पूर्व हवेलीत एका टप्प्यातील रिंगरोडच्या कामाला अद्याप ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग करण्याची प्रक्रिया रखडल्याने पूर्व हवेलीत प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पूर्व हवेली तसेच शहराच्या उपनगरात पुणे -सोलापूर तसेच पुणे-अहिल्यानगर या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांची आवस्था अतिशय बिकट झाली आहे. या दोन्ही महामार्गावर मागील काही वर्षांत व्यावसायिक ,निवासी तसेच गृहप्रकल्पांची व्याप्ती वाढल्याने शहरीकरणाचा वेग वाढल्याने पर्यायाने वाहतुक कोंडीचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. या दोन्ही मार्गांवर वाहतुक कोंडी आता प्रवासी तसेच नागरीकांच्या मनस्तापाचा कडेलोट करु पाहत आहे. नोकरदारवर्ग ,विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल या मार्गावर होऊ लागले आहे. तासणतास वेळ वाढविणारा मार्ग म्हणून प्रवासी व वाहनचालकी या समस्येला त्रस्त होऊन या समस्येतून सुटका कधी होणार म्हणून प्रश्न विचारत आहे.

पुणे शहराला जोडणाऱ्या पुणे-सोलापूर तसेच पुणे- अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील उपनगरांतील हडपसर ते उरुळीकांचन तसेच पुणे- अहिल्यानगर महामार्गावर खराडी ते लोणीकंद मार्गांची वाहतुक कोंडीची अतिशय दैना झाली आहे. सणवार,सलगसुट्टी तसेच लग्नसराई या महामार्गावर नागरीकांच्या गळ्याशी आली आहे. वाहतुक कोंडीचा फुगा दिवसेंदिवस वाढत चालला असून ढिम्म शहर पोलिस यंत्रणा वाहतुक नियोजनाचे सोपस्कार पूर्ण करीत नसल्याने नागरीकांच्या संयमाचा बांध फुटत चालल्याची आवस्था पहायला मिळत आहे.
राज्य सरकारने या रस्त्यांची कोंडी फोडण्यासाठी उन्नत इलिव्हेटेड मार्गांची कार्यवाही सुरू केली असली तरी या राष्ट्रीय महामार्गांवर पर्यायी वाहतुकीसाठी नसलेली व्यवस्था तर अरुंद रस्त्यांनी चालू परिस्थिती मार्ग विकसित करताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार असल्याने रिंगरोडचा कच्च्या मार्ग तयार करुन वाहतुक सुरळीत करणे हाच पर्याय असून रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामाची गरज निर्माण झाली आहे.
‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडच्या कामात उत्तर व दक्षिण असे मिळून ७ टप्पे केले आहेत. या संपूर्ण प्रकल्पाची भूसंपादन प्रक्रिया ९८% पूर्ण आहे. रिंगरोडच्या पूर्व भागात १३८ किलोमीटरचे कामे सुरू झाली आहेत. मात्र पश्चिम भागात कामे संथगतीने सुरू आहेत. तर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ व पुणे -छत्रपती संभाजीनगर प्रस्तावित मार्गाला मंजुरी मिळाल्याने या भागात रिंग रोड मार्गात बदल झाला आहे. पश्चिम टप्प्यात सोरतापवाडी ते शिवरी या ३२ टप्प्याचे काम नव्याने एमएसआरडीसीकडे देण्यात आले आहे.मात्र मागील काही महिन्यांपासून ही प्रक्रिया रखडून पडली आहे. तीच परिस्थिती वाडेबोल्हाई या टप्प्यात आहे.
तीन वर्षांची जबाबदारी पूर्ण होईल!
रिंग रोडच्या प्रकल्पाला ठेकेदार एजन्सीला तीन वर्षात काम पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र पूर्व हवेलीत मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याची आवस्था आहे.ताबा, सर्व्हेक्षण, सपाटीकरण तसेच पुल बांधणे ही महत्त्वाची कामे सुरू न झाल्याची आवस्था आहे.
आचारसंहितेनंतर कामाची कार्यवाही सुरु होईल…
“सोरतापवाडी ते शिवरी या ३२ किलोमीटर टप्प्याचे काम यापूर्वी एनएचआय पूर्ण करणार होते. परंतु हे काम व उर्वरित सर्व रस्ता एमएसआरडीसी पूर्ण करणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता पूर्ण झाल्यानंतर टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन ठेकेदार एजन्सी नियुक्त करुन नियोजित कालावधीत काम पूर्ण करण्यात येईल”
-राहुल वसईकर, अधिक्षक अभियंता, एमएसआरडीसी