अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा? शिंदे गटात खळबळ…!

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र महाविकास आघाडीमध्ये आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद पहायला मिळत आहेत.

अशातच शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेल्या एका विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. गोव्यात माध्यमांशी बोलत असताना अडसूळ म्हणाले होते, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर भाजपसोबत गेला तर आम्ही स्वत:च्या बळावर निवडणुका लढवू शकतो’ त्यामुळे पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी राज्याला पहायला मिळू शकतो.

त्यानंतर अंजली दमानिया यांचे ट्वीट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, १५ आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच.
अंजली दमानिया आणि आनंदराव अडसूळ या दोघांच्या विधानामागे सत्तांतराचा वास आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही भाजप नेत्यांनी अमित शहा यांना राज्यातील राजकीय परिस्थितीची संपूर्ण माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी रात्री शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जात आहे. या संपूर्ण घडामोडींसह राज्यातील आणि मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी अमित शहा यांना दिला आहे.