दोन सख्खा भावांनी मिळून आईवडिलांची केली हत्या, संपूर्ण राज्याला हादरवणारे कारण आलं समोर….

पुणे : रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं दोन भावांनी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची निर्घृण हत्या केली आहे. दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ही धक्कादायक घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात घडली. महादेव बाळ्या कांबळे (वय ९५) आणि त्यांच्या पत्नी विठाबाई महादेव कांबळे (वय ८३) हे वृद्ध दाम्पत्य येथे राहत होते. त्यांची मालमत्ता त्यांच्याच नावावर होती, हाच वादाचा केंद्रबिंदू ठरला.
मिळालेल्या माहिती नुसार, त्यांची दोन मुले नरेश महादेव कांबळे (६३) चंद्रकांत महादेव कांबळे (६०) ही वृद्ध आईवडिलांना घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने, आईवडिलांनी त्यांना घरात येण्यास बंदी घातली होती. त्याचवेळी मालमत्ता आईवडिलांच्या नावे होती. त्यामुळे वाटणीवरून आईवडिलांचे व मुलांचे वाद झाले होते.

याच वादातून नरेश आणि चंद्रकांत या दोन मुलांनी आईवडिलांची गळा दाबून हत्या केली आणि घरातून पोबारा केला. शनिवारी सायंकाळी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेत तपास केला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वाड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. तपासात मुलांनीच हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक केली आहे.