मुंबईसाठी पुढील 24 तास धोक्याचे, होणार 26 जुलैची पुनरावृत्ती? जोरदार पावसाचे कारण आले समोर…

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने परिस्थिती खराब आहे.

हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट तर घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. परिणामी नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
काही ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसले असून, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पावसाचा अचानक वाढलेला जोर नेमका का? यावर पुणे वेधशाळेच्या हवामान शास्त्रज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून वारे सक्रिय झाले असून, त्यामुळे एक द्रोणीय रेषा तयार झाली आहे. ही रेषा उत्तर कोकणापासून सुरू होऊन केरळपर्यंत जाते. याच कारणामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस कोसळत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस कोकण व घाटमाथ्यांसाठी अत्यंत निर्णायक असतील. मध्य महाराष्ट्रातील समतल भागांमध्ये ऑरेंज अलर्ट असून, त्यानंतर यलो अलर्ट दिला जाणार आहे. मराठवाडा व विदर्भातही आज ऑरेंज अलर्ट असून, उद्यापासून पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.