विवाहबाह्य संबंधांमध्ये ‘हे’ शहर नंबर वन, लग्नानंतर अफेअर करण्यात पुणेकरही कमी नाहीत; अहवाल आला समोर…

पुणे : विवाहाला विश्वास आणि निष्ठेचा पवित्र बंध मानले जात असले तरी आता या नात्यातील विश्वास मोठ्या प्रमाणात तुटताना दिसतो आहे. एका नव्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली असून भारतातील विवाहित लोक मोठ्या संख्येने विवाहबाह्य संबंध ठेवत असल्याचे उघड झाले आहे.

ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मच्या जून २०२५ मधील अहवालात या ट्रेंडचा धक्कादायक मागोवा घेतला असून, कांचीपुरम हे शहर अव्वल ठरले आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी १७व्या क्रमांकावर असलेले कांचीपुरम यंदा थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.
या यादीत दिल्ली-एनसीआरचे तब्बल नऊ जिल्हे आहेत. सेंट्रल दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, तर गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, साउथ वेस्ट, ईस्ट, साउथ, वेस्ट आणि नॉर्थ-वेस्ट दिल्ली हे जिल्हे ‘टॉप २० मध्ये आहेत. तर पुणे आठव्या, बेंगळुरू नवव्या आणि साउथ दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहेत.

अहवालानुसार टॉप १० क्रमवारीत १) कांचीपुरम, २) सेंट्रल दिल्ली, ३) गुरुग्राम, ४) नोएडा, ५) साउथ वेस्ट दिल्ली, ६) देहरादून, ७) ईस्ट दिल्ली, ८) पुणे, ९) बेंगळुरू आणि १०) साउथ दिल्ली अशी नावे आहेत. त्यानंतर ११) चंदीगड, १२) लखनौ, १३) कोलकाता, १४) पश्चिम दिल्ली, १५) कामरूप, १६) उत्तर-पश्चिम दिल्ली, १७) रायगड (छत्तीसगड), १८) हैदराबाद, १९) गाझियाबाद आणि २०) जयपूर या शहरांचा समावेश आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महानगरांतील व्यस्त जीवनशैली, सोशल नेटवर्किंगचा वाढता वापर, कामाचे दीर्घ तास आणि वैवाहिक नात्यातील भावनिक दुरावा या कारणांमुळे वैवाहिक नातेसंबंधांमध्ये बदल दिसत आहेत.
काहींना नव्या नात्यांचा ‘थ्रिल’ आणि भावनिक पूर्ततेचा शोध असतो, तर ओटीटीवरील कंटेंटही या संबंधांना सामान्य आणि ग्लॅमरस दाखवत असल्याने अपराधीपणाची भावना कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
पुण्यात विद्यार्थ्यांची मोठी संख्या, आयटी-सेवाक्षेत्रातील तरुण व्यावसायिक आणि देशभरातून झालेल्या स्थलांतरामुळे बहुसांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे. वाढती नाइटलाइफ, स्वातंत्र्यपूर्ण सामाजिक मिश्रण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे ‘नवे कनेक्शन’ तयार होण्याचा वेग वाढला आहे.
परिणामी, काही जण विवाहबाह्य किंवा मुक्त नात्यांकडे आकर्षित होत असल्याचे ट्रेंड विश्लेषकांचे मत आहे. मात्र, हा सर्व समाजाचा चेहरा असा अर्थ नसून, बदलत्या शहरी जीवनशैलीतील काही प्रवृत्तींना हा अहवाल अधोरेखित करतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.