शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ, ६० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे पुन्हा एकदा एका आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यावर मुंबईतील एका व्यावसायिकाने ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

दीपक कोठारी हे लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सन २०१५ मध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा विस्तार करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम घेतली होती. मात्र, या पैशांचा वापर व्यवसायासाठी न करता वैयक्तिक खर्चासाठी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, तक्रार दाखल झाल्यानंतर जुहू पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०१५ ते २०२३ या कालावधीत दीपक कोठारी यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी पैसे दिले होते, परंतु त्यांचा गैरवापर झाला.

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे वकील प्रशांत पाटील यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, हे प्रकरण पूर्णपणे जुने असून, यावर आधीच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल , मुंबई येथे सुनावणी होऊन ४ ऑक्टोबर २०२४ रोजी निकाल लागला आहे. पाटील यांनी स्पष्ट केले की, हे आरोप पूर्णपणे दिवाणी (सिव्हिल) स्वरूपाचे असून, यात कोणताही फौजदारी पैलू नाही.

त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कंपनी आर्थिक संकटात अडकल्यानंतर हा व्यवहार NCLT मध्ये दीर्घ कायदेशीर प्रक्रियेत गेला होता. ऑडिटर्सनी वेळोवेळी EOW ला सर्व कागदपत्रे आणि पुरावे सादर केले आहेत, तसेच संबंधित चार्टर्ड अकाउंटंटने गेल्या वर्षभरात १५ पेक्षा जास्त वेळा पोलिसांना माहिती दिली आहे.