‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा….

बारामती : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या २०व्या हप्त्याचे वितरण देशभरातील ९.७२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्या आले. यावेळी एकूण ₹२०,५०० कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण ही बाब शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणाचा निश्चितच मोठा टप्पा आहे.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट येथे उपस्थित राहून कार्यक्रमाचे व्हर्चुअल प्रक्षेपण अनुभवले. यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकारकडून ग्रामीण भागासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू असलेल्या योजना वास्तवात कशा उतरत आहेत, याचा थेट अनुभवही आज मिळाला.
पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जे प्रयत्न करत आहे, ते निश्चितच परिवर्तन घडवणारे आहेत. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरली आहे, असेही यावेळी ते म्हणाले.

तसेच ते म्हणाले, दरवर्षी थेट बँक खात्यात ६,००० रुपये जमा होण्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय आर्थिक मदत खात्यात येत नाही. ९.७२ कोटींपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो आहे. ही रक्कम उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्ती किंवा तातडीच्या गरजांमध्ये मोठा आधार ठरते.
पारदर्शक, डिजिटल आणि थेट लाभाच्या या योजनेने शेतकऱ्यांच्या सन्मानात आणि आत्मविश्वासात वाढ केली आहे. बारामतीत झालेल्या कार्यक्रमात ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे मुख्याधिकारी डॉ. नीलेश नलावडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. धीरज शिंदे, डॉ. विवेक भोईटे, डॉ. मिलिंद जोशी, डॉ. संतोष गदरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.