शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला राज्यभर रास्तारोको, सर्वपक्षीय बैठकीत निर्णय, शेतकरी आक्रमक….

कोल्हापूर : येथील शासकीय विश्रामगृह सभागृह येथे अलमट्टी व शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीस आमदार सतेज पाटील , आमदार अरुण लाड – अरुण गणपती लाड मा. आमदार उल्हास पाटील, व्ही बी पाटील, विक्रांत पाटील किणीकर, विजय देवणे, सर्जेराव पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी माहिती दिली. ते म्हणाले, १ जुलै रोजी शक्तीपीठ विरोधात राज्यभर रास्तारोको करण्याचे ठरले असून कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या जनभावना लक्षात घेऊन शिरोली पुलाजवळ पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
त्याबरोबरच अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यामुळे पुराची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. राज्य सरकार व कर्नाटक सरकार मध्ये समन्वय नसल्याने अलमट्टी धरणातील आजचा पाणीसाठा जवळपास ५१६.८३ मीटर इतका करण्यात आला आहे. याबाबत परस्पर चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे आहे.
भविष्यात जुलै व ॲागस्टमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्थिती गंभीर होणार आहे. यामुळे शासनाने वेळीच याबाबत सकारात्मक पावले न उचलल्यास पुढील महिन्यात सरकारविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.