अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्षापनदिनाला मंत्री दत्तात्रय भरणे, छगन भुजबळ यांची गैरहजेरी, चर्चांना उधाण, नेमकं कारण काय?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील , दत्तात्रय भरणे उपस्थित नव्हते. यामुळे याबाबत कार्यक्रमात चर्चा सुरू झाली. त्याबाबत अजित पवारांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यात होत असला तरी राज्याच्या इतरही काही भागात आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम साजरा होत आहे.
आजच्या या कार्यक्रमाला आपले काही कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. छगन भुजबळ यांचा आधीच विदेश दौरा ठरलेला होता. दत्तात्रय भरणे यांचाही ३० दिवसांपूर्वी विदेश दौरा ठरलेला होता. असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.
तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची तब्येत बरी नाही. त्यामुळे आजच्या आपल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हे तीनही प्रमुख नेते उपस्थित राहू शकले नाहीत. अशी माहिती देखील देण्यात आली. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
दरम्यान, यावेळी अजित पवार म्हणाले, आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामधून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असे अजित पवार यांनी सांगितले. आपल्या पक्षाला कधीही बहुमत मिळालं नाही.
आपल्याला नेहमीच सत्तेत सहभागी व्हावं लागलं. कारण आधीपासूनच राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून काम करावे असेही ते म्हणाले.