आपली लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम, जयंत पाटलांच्या वाक्याने राष्ट्रवादीत सगळेच सुखावले, शरद पवारांनीही दिली दाद, नेमकं काय घडलं?

पुणे : आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापनदिन पुणे शहरात साजरा केला जात आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले, आम्ही सगळे तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहोत. तुकारामांनी सांगितलं आहे, ‘भले देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी’.
जयंत पाटील यांनी तुकाराम विरुद्ध नथुराम’, असा उच्चार करताच सभागृहातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य संचारले. यावेळी शरद पवारांच्या चेहऱ्यावरही हसू उमटले. यामुळे का कार्यक्रम जयंत पाटील यांनी गाजवला आहे. पुण्यातील बालगंधर्व सभागृहात शरद पवार गटाचा मेळावा सुरू आहे.
या मेळाव्यात मोठी घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनाम्याचे सूतोवाच केले.जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी २०१८ पासून देण्यात आली होती. जवळपास सात वर्ष ते प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यकरत होते. ९ जानेवारी २०२५ रोजी जयंत पाटील यांनी थोडे दिवस थांबा राजीनामा देणार असं वक्तव्य केलं होतं.
आता पुन्हा एकदा मला या जबाबदारीतून मोकळं करा म्हणत राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या वाटचालीवर भाष्य केले. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विविध आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना जयंत पाटील यांनी म्हटले की, शरद पवारांनी मला संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून ७ वर्ष राहिलो, जबाबदारी सांभाळली. आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यांनी असे वक्तव्य करताच सभेत घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर जयंत पाटील यांनी शरद पवार आपले नेते असून अंतिम निर्णय ते घेतील असे म्हटले.