बारामती व दौंडमध्ये अतिमुसळधार पावसाचा कहर! अजित पवार म्हणाले, वर्षातला निम्मा पाऊस एका दिवसात पडलाय…

पुणे : गेल्या अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडत राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रात अक्षरश: दाणादाण उडवून दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. बारामती तालुक्यात कधी नव्हे इतका पाऊस कोसळला आहे.
बारामतीत तर एका दिवसात तब्बल ७ इंच पावसाची नोंद झाली आहे. ही आकडेवारी वर्षभराच्या निम्म्या सरासरी पावसाइतकी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
बारामतीत नीरा डावा कालवा फुटल्यानं पाणी थेट पालखी महामार्गावर शिरलं. त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पिंपळी परिसरात कालवा फुटल्यामुळे अनेक घरे जलमय झाली असून, नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान, अजित पवारांनी पहाटेच बारामती, काटेवाडी, कान्हेरी या भागांचा दौरा करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा दाखवत आपल्या व्यथा मांडल्या. अजित पवारांनी प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले आहे.
दौंडमध्ये पुणे-सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला असून, एक इनोव्हा कार वाहून गेल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मी पुणे जिल्हाधिकारी आणि इतरांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. दौंड आणि बारामती परिसरात प्रचंड पाऊस झाला आहे. निम्मा पाऊस एका दिवसात पडला आहे. बारामती तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी १४ इंच इतकी आहे.
त्यापैकी ७ इंच पाऊस रविवारी एका दिवसात पडल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यानंतर अजित पवार हे कान्हेरी आणि काटेवाडी गावाच्या दिशेने रवाना झाले. कन्हेरी गावात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. याठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांनी भिजलेला कांदा अजित पवारांना दाखवला. अजित पवार सध्या या संपूर्ण परिसरात नुकसानीचा आढावा घेत फिरत आहेत.