अजित पवारांनी सांगितला महिला आरक्षण बिल पास करतानाचा शरद पवारांचा किस्सा, म्हणाले, पवारसाहेबांनी ठणकावून सांगितलं की….

पुणे : महिलांना राजकारणात ३३ टक्के आरक्षण आपण दिलं आहे. जर स्त्री चूल आणि मूल घर संभाळू शकते ती स्त्री गाव, नगरपरिषद देखील संभाळू शकते असा विश्वास आम्हाला आहे, म्हणून राजकारणात हे आरक्षण आणलं असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले आहे.

अजित पवार यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवारांबाबतचा महिला आरक्षण देतानाचा एक किस्सा सांगितला आहे. पुढे अजित पवार म्हणाले, शरद पवारसाहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आरक्षणाचे बिल आणलं, पवारसाहेबांनी सांगितलं होतं की, हे बिल मंजूर होईपर्यंत सभागृहाचे कामकाज सुरू राहील.
मला आठवत आहे की, सभागृह चार वाजेपर्यंत चालवलं आणि महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतलं. साहेबांनी ठणकावून सांगितलं की, आज कितीही उशीर झाला तरी चालेल पण आज महाराष्ट्रात महिला आरक्षणाचे बिल मला आणायचा आहे आणि हे बिल पवारसाहेब मुख्यमंत्री असताना पास झालं होतं. असा महिला आरक्षण बिल पास करतानाचा किस्सा अजित पवारांनी सांगितला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, आज मुली सगळीकडे पुढं जात आहेत. मुली फक्त अभ्यासातच लक्ष देतात त्या मुलांसारखं इकडे तिकडे लक्ष देत नाहीत. त्याच्यामुळे ज्या देशात महिलांना सन्मान दिला जातो ते देश पुढे आहेत. जिथं महिलांना सन्मान दिला जात नाही तो देश मागासलेला असतो.

मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे. आता भिडे वाडा सरकारने ताब्यात घेतला आहे. तिथं पहिली मुलींची शाळा सुरू झाली, होती तिथं काम आता सुरू केलं आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे.