शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी पाच कारखान्यांवर कारवाई, साखर आयुक्तांची मोठी कारवाई ..

सोलापूर : गतवर्षी पार पडलेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या पाच साखर कारखान्यांची आरआरसीकडून साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे. यामध्ये मोठ्या साखर कारखान्याचा समावेश आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत आधी कल्पना देऊन सुद्धा पैसे दिले गेले नाहीत.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तीन व बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्यांचा समावेश आहे. साखर सहसंचालक कार्यालयाकडून अनेकवेळा नोटीस बजावण्यात आल्यानंतरही साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाहीत. त्यांच्या साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ हे सुनावणी घेतात. यामुळे ही कारवाई आली आहे.
या पाच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत. मागील हंगामात शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याने आतापर्यंत २० कारखान्यांवर कारवाई झाली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक १२ साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत.
साखर कारखाने बंद होऊन दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. अनेक कारखाने एफआरपीची रक्कमही देण्यास तयार नाहीत. अशा राज्यातील २० साखर कारखान्यांवर दोन टप्प्यांत आरआरसी अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच पैसे देण्यास सांगितले आहे.
पहिल्या टप्प्यात १५ साखर कारखान्यांवर केलेल्या कारवाईत सोलापूर जिल्हातील ९, तर दुसऱ्या टप्प्यात कारवाई झालेल्या पाच कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्हातील तीन कारखाने आहेत. यामध्ये स.शि. वसंतराव काळे पंढरपूर – १,११६, सिद्धेश्वर कुमठे सोलापूर – २,०९२, अवताडे शुगर मंगळवेढा – २,३०९, जय महेश माजलगाव, बीड – १,८६७, गंगामाई शेवगाव अहिल्यानगर ४,२१० यांचा समावेश असून ही थकबाकीचे आकडे लाखांत आहेत.