खेळता खेळता तीन चिमुकल्यांच्या कालव्यातील पाण्यात उड्या, दोघे बचावले, एकाचा मृत्यू, सहजपुर हद्दीत दुःखद घटना….

उरुळी कांचन : येथील सहजपुर ग्रामपंचायत हद्दीतील माकर वस्ती परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कालव्याच्या पाण्यात खेळत खेळत उडी मारलेल्या तिघांपैकी दोघांना स्थानिक तरुणाच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र एकाचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

ही मुले व त्यांचे आई वडील हे सहजपुर ग्रामपंचायत हद्दीतील कालव्याच्या परिसरात राहतात. घटनेच्या दिवशी तिघेही कालव्याच्या बाजूला खेळत होती. यावेळी खेळत खेळत तिघांनीही कालव्याच्या पाण्यात उड्या मारल्या. त्यांना काहीच माहिती नव्हते. या मुलांनी कालव्यात उडी मारल्याचे येथील निलेश रामदास खोमणे यांच्या पत्नीने पाहिले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला.
यावेळी घरात असलेल्या निलेश खोमणे यांनी पळत जाऊन पाण्यात पडलेल्या दोघांना वरती काढले. असीम जावेद मुजावर (वय- 3) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तसेच मेहक जावेद मुजावर (वय -7), आणि रूहान जावेद मुजावर वय – 5) असे वाचलेल्या दोन चिमुकल्यांची नावे आहेत. दोन मुलांना पाण्यातून वरती काढेपर्यंत असीम पाण्यात बुडाला.

यावेळी याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. नंतर शोध घेतला असता कालव्याच्या एका बाजूला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे. मात्र त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे उपस्थित असलेल्या नागरिकांनी सांगितले.