दुष्काळात तेरावा महिना!! महावितरणने वाढवली प्रति युनिट ६० पैशांनी वीज, बाहेरून वीज खरेदी…

मुंबई : महावितरणने घरगुती ग्राहकांची वीज प्रति युनिट ६० पैशांनी महाग केली आहे. यासाठी इंधन समायोजन शुल्क (एफएसी) चा आधार घेण्यात आला आहे. मागच्यावर्षी उन्हाळा आणि त्यानंतर मान्सूनमध्ये वीजपुरवठा कमी झाल्याने बाहेरून महाग वीज खरेदी करण्यात आली होती. यामुळे आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.
भरपाईसाठी ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्क आकारावे लागेल. १ एप्रिलपासून राज्यात स्वस्त वीज उपलब्ध होणार होती, त्याच दिवशी महावितरणने परिपत्रक काढून मार्चमध्ये वापराच्या प्रत्येक युनिटवर एफएसी जमा करण्याचे आदेश दिले. यासाठी, कंपनीने ३० मार्च २०२० च्या आयोगाच्याच आदेशाचा हवाला दिला. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळमधील प्रत्येकी एक युनिट बंद आहे. अशा स्थितीत महावितरणला महागडी वीज खरेदी करावी लागणार आहे. परिणामी नागरिकांना एफएसीद्वारे यापुढेही आर्थिक भार सोसावा लागणार आहे. महावितरणचे वीज खरेदीचे महागडे दर पाहता ही वसुली येत्या काही महिन्यांतही सुरूच राहणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम घरगुती ग्राहकांसह प्रत्येक वर्गावर होणार आहे.
यामध्ये व्यावसायिक ग्राहकांना ४० ते ६० पैसे, कृषी १५ ते ३० पैसे, पथदिवे ३० ते ३५ पैसे, पाणीपुरवठा योजना ३० ते ३५ पैसे, ईव्ही चार्जिंग स्टेशनला ४० पैसे आणि उद्योगांना ३५ ते ४० पैसे अधिक द्यावे लागतील. तसेच घरगुती ग्राहकांवर परिणाम ५०० युनिट्सवर ६० पैसे, ३०१ ते ५०० युनिट्स ५५ पैसे, १०१ ते ३०० युनिट्स ४० पैसे, ० ते १०० युनिट्स २५ पैसे बीपीएल १० पैसे, असं गणित असणार आहे.
दरम्यान, राज्यात विजेची मागणी ३० हजार मेगावॉटच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात ७ एप्रिलला सर्वाधिक मागणी २९,४११ मेगावॅट होती. यामध्ये मुंबईच्या ३७५३ मेगावॅटचाही समावेश आहे. दुसरीकडे, राज्यात खासगी कारखान्यांसह उत्पादन १८,५०३३ मेगावॅट होते.