अजितदादा बीडचे पालकमंत्री झाले अन् पोलीस अधिकारी घाबरले!! बीड पोलीस दलातील तब्बल 107 अधिकाऱ्यांनी केली बदलीची विनंती…

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. तसेच पोलीस दलात रोज नवनवीन प्रकरणे उघडकीस येत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील काही अधिकारी आणि पोलिसांचे कारनामे समोर येऊ लागले. यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गुन्हेगारांशी संबंध ते त्यांच्या काळ्या धंद्यांमध्ये भागिदारी, असे अनेक प्रकार उघडकीस येताना दिसत आहेत. अशातच आता बीड पोलिस दलात एक खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. बीड जिल्ह्यात तब्बल 107 पोलिस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी विनंती अर्ज केल्याचे पुढे आले आहे.
त्यामुळे बीड जिल्ह्यात नेमकं असं काय घडतंय? ज्यामुळे पोलिस अधिकारी या ठिकाणी ड्युटी करण्यास अनुत्सुक आहेत, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या माहितीने खळबळ उडाली असून यामुळे आपल्याला या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा अंदाज येईल.

दरम्यान, या अगोदर अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती. असे असताना अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलीसाठी विनंती अर्ज आल्याने त्याची चर्चा होत आहे. अजितदादा यांनी पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही असा दम दिला आहे. यामुळे अधिकारी घाबरले आहेत.

येथील 107 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बीडबाहेर बदलीसाठी विनंती अर्ज केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. मात्र देशमुख यांनी हत्या, वाल्मिक कराड यांचे कारनामे यामुळे पोलीस देखील अडचणीत आले आहेत.
यामुळे येणाऱ्या काळात देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनेक गैर गोष्टी समोर येऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातिवाद समोर आला. पोलीस दलात देखील हा जातीवाद असल्याचा आरोप वारंवार केला जात आहे. यामुळे वातावरण तापले आहे.