तानाजी सावंत यांच्या मुलाने घर का सोडलं? आता मोठ्या लेकाने सांगितली खरी माहिती, नेमकं काय घडलं?

पुणे : शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचे कथित अपहरण नाट्य सोमवारी चांगलेच चर्चेत आले. मित्रांसोबत बँकॉकला जाणाऱ्या मुलाचे विमान रोखण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपले राजकीय वजन वापरले. त्यातून पुणे-बँकॉक चार्टर्ड विमान चेन्नईत थांबवण्यात आले.

ऋषिराज सावंत यांनी चार्टर्ड विमान बुक करुन बँकॉकला जाण्याचा निर्णय का घेतला, याची माहिती समोर आली आहे. तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव गिरीराज सावंत यांनी सगळंच सांगितले आहे.
सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा दुपारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घरातून तडकाफडकी बाहेर पडला. स्पेशल चार्टर फ्लाईटने तो बँकॉकला निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बजाब एव्हिएशनच्या फाल्कन २००० एलएक्स नावाच्या खासगी विमानाने ऋषीराज सावंत तीन मित्रांसह बँकॉकला जायला निघाले होते.

तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली. पुणे पोलिसांनी तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर वाऱ्याच्या वेगाने सूत्रे फिरवली. अवघ्या चार तासांत बँकॉकला जाणारे विमान आणि सावंतांचा मुलगा दोघांनाही पुण्यात लँड करण्यास पुणे पोलिसांनी भाग पाडले.
ऋषिराज सावंत यांनी घर सोडून जाण्यामागे कौटुंबिक वाद, कलह असल्याची चर्चा आहे. मात्र, तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. गिरीराज सावंत यांनी सांगितले की, माझा लहान भाऊ ऋषिराज सावंत याच्याशी संपर्क होत नव्हता, तेव्हा तो कुठे निघून गेला कळत नव्हतं म्हणून तानाजी सावंत प्रचंड अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतरच आम्ही सिंहगड पोलीस स्टेशन या ठिकाणी अपहरणाची तक्रार दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील फोन करून तानाजी सावंत यांनी मदतीसाठी विनंती केली असल्याचे सांगितले. या तक्रारीनंतर तो बँकॉकला काही कामानिमित्ताने गेला असल्याचे समजले अशी माहिती गिरीराज सावंत यांनी दिली.
