Shirur : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा! ‘अशोक पवार चोर है’च्या घोषणा…


Shirur : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूने प्रश्नोत्तराच्या वेळेस गोंधळ झाल्याने सभा गोंधळातच पार पडली. सभेतील सर्व विषय मंजूर झाल्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी सांगितले.

सत्ताधाऱ्यांनी गोंधळातच सभा गुंडाळली असल्याचा आरोप कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी केला. या वेळी दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात घोषणा देण्यात आल्या. तसेच दोन्ही बाजूने सभेच्या ठिकाणीच पुन्हा प्रतिसभा घेण्यात आल्या.

सभा सुरू होण्यापूर्वीच माईकचा ताबा घेण्यासाठी काही सभासदांमध्ये गोंधळ सुरू झाला, त्यानंतर वातावरण शांत होऊन कारखान्याचे उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील हे विषयपत्रिका वाचत असतानाच काही सभासदांनी त्यावर आक्षेप घेत घोषणाबाजी चालू केली.

प्रस्ताविक भाषणात कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी कारखान्याची वस्तुस्थिती मांडताना सहकारी साखर कारखानदारी कशी अडचणीत आली आहे हे सांगितले. घोडगंगा कारखान्याचे कर्ज ‘एनपीए’ मध्ये नसताना सरकार बदलल्यामुळे केवळ राजकीय सूडाने शासनाने कारखान्याचे कर्ज नाकारले आहे, कारखाना त्यामुळेच अडचणीत आला आहे.

‘एनसीडीसी’ चे कर्ज कारखान्याला मिळावे यासाठी आता उच्च न्यायालय निश्चित न्याय देईल आणि कारखाना परत सुरू होईल. आगामी हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. विषयपत्रिकेचे वाचन चालू असतानाच गोंधळातच काही विषय मंजूर होत होते.

कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी माईकचा ताबा घेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, असा आग्रह केला. आमदार अशोक पवार यांनी माइकचा ताबा घेत अध्यक्ष सर्व प्रश्नांना उत्तरे देतील, गोंधळ घालू नका, असे सांगितले.

या वेळी आमदार अशोक पवार व दादा पाटील फराटे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूने गोंधळ चालूच असताना सभासदांनी विषयाला मंजुरी दिल्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी सांगितले. Shirur

सभासदांनी विचारलेल्या प्रश्नावर समर्पक उत्तरे न देताच सभा गुडांळली व सभेत पोलिस फौजफाटा कशासाठी असे ही काँग्रेसचे महेश ढमढेरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष रवी काळे व माजी कारखान्याचे सदस्य सुधीर फराटे, ॲड. सुरेश पलांडे यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात गोंधळ सुरूच होता, त्यानंतर सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी झाली. सभेत दादा पाटील फराटे, रवी काळे, महेश ढमढेरे बाळासाहेब घाटगे शरद गद्रे, सुधीर फराटे, ॲड. सुरेश पलांडे, राहुल पाचर्णे, तात्या शेलार यांनी प्रश्न विचारले, त्यानंतर सभेचे कामकाज संपल्यावर दोन्ही बाजूने घोषणाबाजी करून सभेच्या ठिकाणी परत सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूने समर्थक सभासदांमध्ये पुन्हा प्रतिसभा घेण्यात आल्या.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!