Uruli Kanchan : पूर्व हवेलीतील या गावांची नुकसान काही पाठ सोडेना! यंदा वादळी वाऱ्याने घरांसह पिकांचे केले नुकसान, नुकसानीचे दृष्टचक्र सुरुच…!!

Uruli Kanchan उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यात रविवार (दि.१९) रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने घरांची छपरे उडून जाण्यासह वृक्ष उन्मळून पडले असून फळबागा, भाजीपाला , शितगृहांचे कागद फाडण्याचे प्रकार घडून शेतीचे व शेतकऱ्यांच्या खाजगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत फळबागांंना मोठी झळ पोहचल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगाम वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्व हवेली तालुक्यात डोंगरी भागातील वळती , शिंदवणे , तरडे व आळंदी म्हातोबा या गावांना मान्सून पूर्व वळीव पावसाने रविवारी चांगलेच झोडपले आहे. सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने शेती व शेतकऱ्यांच्या खाजगी मालमत्तेला मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांचे पत्र्याचे छप्पर उडाले आहे. तर भिंती कोसळणे, मोठे वृक्ष घरांवर व वाहनांवर आदळून नुकसान झाले आहे. वळती गावात दहाहून अधिक शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तर सिताफळ, डाळींब , पपई , आंब्याची झाडे जमीनदोस्त झाली आहे. भाजीपाला पिक पाण्याखाली गेले आहे. असेच प्रकार तरडेत झाले असून काहींचे घरांचे पत्रे उडाले आहेत. तर शेतकऱ्यांच्या हरीतगृहाचे पेपर फाटले असल्याने रोपवाटिकेचे नुकसान अटळ आहे.
आळंदी म्हातोबा व शिंदवणेत वादळाने वृक्ष उन्मळून पडले आहेत. काही घरांवर व शाळेवर वृक्ष पडून नुकसान झाले आहे. या ठिकाणी शितगृहांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानीचा प्रकार घडताच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी नुकसान पोहचलेल्या परिस्थितीची पाहणी केली आहे. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून महसुल व कृषी विभागाला तातडीने पंचनामा करण्याचा सूचना दिल्या आहेत. ”
“पूर्व हवेली तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसानीचा पंचनामा करण्याचा स्थानिक मंडल अधिकारी व तलाठी यांना दिल्या आहेत. जीओ टॅगिंग द्वारे पंचनामे घेण्याचे आदेश दिले आहेत, ज्यांचे नुकसान झाले त्यांनाच मदत मिळावी म्हणून सूचना दिल्या आहेत. पंचनाम्यांचे काम आजच मोठ्या प्रमाणात झाले आहेत. संपूर्ण नुकसानीचा अहवाल कृषी व महसूल खात्याकडून शासनाला जाऊन भरपाई देण्यात येईल ”
-तृप्ती कोलते- पाटील , अप्पर तहसिलदार , हवेली
महावितरण कर्मचाऱ्यांचे जिगरबाज काम…
थेऊर उपकेंद्रातून वळती फिडरकडे जाणाऱ्या व वयोमानाने जीर्ण झालेल्या वाहक खांबांना व तारांना वाऱ्याने मोठे नुकसान झाले होते. काही ठिकाणी खांब वाकूनही दुरुस्त काढण्याची शर्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उशिरा रात्रीपर्यंत केली. परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम या वर्गाने उपाशीपोटी करीत होते.