Nagpur News : तरुण एकटक पाहत होता, तरुणींना राग अनावर, मित्राला बोलवलं अन् घडलं भयंकर कृत्य, घटनेने नागपूर हादरलं…

Nagpur News : दिवसागणिक गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत.
सध्या अशीच एक धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. एका वादातून हत्येची घटना घडली आहे. टोमणे मारण्यासह एकटक बघितल्याने चाकूने वार करून युवकाची हत्या करण्यात आली.
ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन तरुणींसह तिघांना अटक केली. हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणींविरुद्धची ही अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई आहे.
रणजित बाबुराव राठोड (वय २८, रा. ज्ञानेश्वरनगर) असे मृतकाचे नाव आहे. अटकेतील मारेकऱ्यांमध्ये आकाश दिनेश राऊत (वय २५, रा.हसनबाग), जयश्री दीपक पानझाडे (वय २४) आणि सविता सायरे (वय २४, दोन्ही रा. वाडी) यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रणजितचे किराणा दुकान असून तो कापडाचाही व्यवसाय करायचा. शनिवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास रणजित हा महालक्ष्मीनगरमधील पान ठेल्यावर आला. याचदरम्यान कापड खरेदी करुन परत जाताना जयश्री आणि सविताही पान ठेल्यावर थांबल्या.
रणजित हा त्यांना एकटक बघायला लागला. त्याने टोमणे मारले. दोघींनी त्याला जाब विचारला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. जयश्रीने तिच्या ओळखीचा आकाश याच्या मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जयश्रीच्या फोननंतर आकाश तेथे आला. Nagpur News
त्याने रणजितसोबत वाद घातला. त्यानंतर चाकूने त्याच्या पोटावर आणि छातीवर वार केले. रणजित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर आकाश, जयश्री आणि सविता पसार झाले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी रणजितचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन दोन तरुणींसह तिघांना अटक केली. आज, सोमवारी तिघांना न्यायालयात हजर करून पोलिस कोठडी घेण्यात येईल.