शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोमणा, म्हणाले…

पुणे : भारताचा नकाशा पाहिला तर केरळ, तामिळनाडू, हैद्राबाद, आंध्र प्रदेश, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओडिशामध्ये भाजपचे राज्य नाही. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये भाजपचे राज्य नव्हतं. पण तिथले आमदार फोडून त्या ठिकाणी भाजपने सरकार आणलं, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

कसबा विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी मेळाव्यात पवार बोलत होते. यावेळी ही निवडणूक लगेचच सत्ता बदलण्यासाठी उपयोगी पडेल अशी नाही. पण ही निवडणूक एक दिशा दाखवणारी आहे, असं पवार म्हणाले.
देशातील पन्नास ते साठ टक्के राज्यं भाजपच्या हातात नाही. त्यामुळे लोकांची मानसिकता भाजपला प्रोत्साहित करण्याची नाही. माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकार मी जवळून पाहिले. मी त्याचा भाग होतो. त्यांनी पक्षीय राजकारण न आणता देश चालवला होता, असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच पवारांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा मारला आहे.

मागील काही दिवस एक तरूण माणूस कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत गेला. ज्यांच्या हाती देशाची सत्ता आहे त्यांनी त्याचे कौतुक कधी केलं नाही, असा टोमणा पवारांनी मोदींना मारला.
