पुणे रिंगरोडसाठी ४० वर्षांची टोलवसुली मर्यादा! इतक्या कालावधीत मार्ग तयार करण्यासाठी डेडलाईन; बांधकाम पूर्ण करण्याचे कसे असणार नियोजन…

जयदिप जाधव

उरुळीकांचन : पुणे व पिंपरी चिंचवड या शहरांच्या वाहतुक कोंडी वर पर्याय म्हणून जागतिक महामार्ग धर्तीवर विकसित करण्यात येणाऱ्या पुणे रिंगरोड विकसित करण्यासाठी रोड मॅप तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर रस्ता विकसित करण्याचे अडीच वर्षांचे उदिष्ठ ठरुन देण्यात आले असून सुमारे ४० वर्षांचा विकसित कंपन्यांना टोलवसुलीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
पुणे रिंगरोड हा विकासाचा कॉरीडॉर होणार असून या प्रकल्पाने रोजगार निर्मिती, औद्योगिक वसाहतीला चालना तसेच अर्थिक विकासाचे मार्ग परिसरात खुले होणार आहेत. त्याचबरोबर रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर वाहनांच्या इंधन खर्चात बचत, प्रवासाच्या वेळेत घट आणि मालाच्या जलद वाहतुकीमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.

या रस्त्यामुळे पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक लक्षणीय प्रमाणात घट होणार असून, त्यामुळे वाहनांच्या प्रदूषणात घट, वायू प्रदूषण कमी, आणि शहरातील पर्यावरण अधिक स्वच्छ व राहण्यायोग्य राहणार असल्याचा अनुमान काढण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहर व भोवतालच्या विकास प्रवासात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी ) कडून आखण्यात आलेला पुणे रिंग रोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. हा एकूण 172 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा महामार्ग असून, यामध्ये पूर्व आणि पश्चिम अशा दोन मुख्य विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
या रस्त्याचे बांधकाम एकूण 12 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी 42,711 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा रस्ता पूर्णतः हा तयार झाल्यावर तो मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, पुणे-नाशिक, पुणे-अहिल्यानगर आणि पुणे-सोलापूर या प्रमुख महामार्गांशी जोडला जाणार आहे. जेणेकरून पुणे शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात कमी होईल.
कामाची कालमर्यादा अडीच वर्ष!
सध्या वाडेबोल्हाई, सिंहगड, खडकवासला, हिंजवडी, उर्से, मुळशी, चाकण आणि सूरतवाडी या प्रमुख ठिकाणी काम सुरू असून, ९ वेगवेगळ्या बांधकाम कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. MSRDC ने २.५ वर्षांची वेळमर्यादा निश्चित केली असून, वेळेत काम पूर्ण न केल्यास कंत्राटदारांवर आर्थिक दंड लावण्याची तरतूदही करण्यात आली आहे. कामात विलंब न होण्यासाठी शिस्तबद्ध अंमलबजावणी हे या प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य आहे.