मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी वाढणार? पुण्यात आज होणार मोठी घोषणा; सर्वांचं लक्ष बैठकीकडे

पुणे : मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून, २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेत असून, विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. एकीकडे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना आता दुसरीकडे ओबीसी नेत्यांच्या हालचालींनाही वेग आला आहे.

पुण्यात ओबीसी समाजाची निर्णायक बैठक
आज पुण्यात ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुण्यातील पत्रकार भवन येथे दुपारी २ वाजता ही बैठक होणार आहे. ओबीसी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या, हक्क आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी पुढील आंदोलनाची दिशा या बैठकीत निश्चित केली जाणार आहे.


या बैठकीत आगामी संघर्षाची रणनीती, आंदोलनाची रूपरेषा आणि पुढील कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके, मंगेश ससाणे आणि नवनाथ वाघमारे हे बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.
मोठ्या आंदोलनाची घोषणा होणार?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर ओबीसी नेत्यांकडूनही हालचाली वाढल्या आहेत. आज पुण्यात होणाऱ्या बैठकीत ओबीसी समाजाच्या पुढील आंदोलनाबाबत कोणता निर्णय घेतला जातो, तसेच आंदोलनाची नेमकी दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.