बायकोने जीवन संपवले, जवानाची पोलिसांना माहिती, शवविच्छेदन अहवालात दुसरंच आलं समोर…
अकोला : अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील दिग्रस बु. इथे एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली होती.
सारिका विकास गवई (वय २७) असं मृत विवाहित महिलेचं नाव आहे. चान्नी पोलिसांनी सैनिक पती विकास जगन्नाथ गवई (वय ३६) याला अटक करून देर सुहास जगन्नाथ गवई (वय ३३), सासरे जगन्नाथ दौलत गवई (वय ६५) यांच्यावर रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला
मिळालेल्या माहिती नुसार, सारिका अन् विकास यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस सुरुवातीला चांगले गेले. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून नेहमी दोघांमध्ये वाद व्हायचा. विकास पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा.
इतकेच नव्हे तर पत्नीही विकासच्या चारित्र्यावर संशय घ्यायची. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, असं पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत विकासने आपल्या पत्नीला मारलं नसल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या शब्दांवर तो अजूनही ठाम आहे. परंतु वैद्यकीय अहवालात सारिकाची हत्या केल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आता पोलिसांना वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेनं तपास सुरू केला.
तपासादरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांना तिच्या पतीवर संशय झाला अन् पतीला ताब्यात घेतले. चान्नी पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे.