Uruli Kanchan : ‘आम्ही इथले भाई’ कोणी इथे आला तर कार्यक्रम करु! उरुळीकांचन च्या दत्तवाडीत पुन्हा भाईराज..!!

Uruli Kanchan : कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार उरुळी कांचन येथील मौजे दत्तवाडी येथून समोर आला आहे. मोबाईल फोन परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. Uruli Kanchan
आरोपींनी तरुणाला मारताना ‘आम्ही इथले भाई आहोत. कोणी आमच्यामध्ये यायचे नाही. कोणी आले तर त्याचा पण कार्यक्रम करू,’ असे म्हणत दहशत निर्माण केली. ही घटना उरुळी कांचन येथील मौजे दत्तवाडी या ठिकाणी घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैभव तरंगे (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद फिरोज मोहम्मद शरीफ सलमानी (वय २५, रा. दत्तवाडी उरळीकांचन) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वैभव तरंगे याने फोन करण्यासाठी मोहम्मद फिरोज यांचा मोबाईल घेतलेला होता. तो मोबाईल फोन परत देत नव्हता. त्यामुळे मोहम्मद फिरोज यांनी तो मोबाईल हातातून ओढून घेतला. त्याचा राग आल्यामुळे वैभव याने फिरोजला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचा भाऊ मोहम्मद फरीद हा वाचवण्यासाठी आला.
दरम्यान, त्यावेळी आरोपीने ठार मारण्याच्या उद्देशाने फरीद याच्या डोक्यामध्ये प्लायवूडची चौकोनी फळी मारली आणि गंभीर जखमी केले. त्यानंतर फिरोज यांना देखील बेदम मारहाण केली. तसेच परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.