सस्पेन्स संपला! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी पावसाची दमदार एन्ट्री..

मुंबई : राज्यात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती पुन्हा वेगाने सुरू झाली असून पुढील काही दिवसांत केरळसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, श्रीलंका, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मोसमी वाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. काही दिवस मान्सूनची गती मंदावली होती, मात्र आता वातावरणीय बदलांमुळे मान्सूनसाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विशेषतः २५ ते २८ मे दरम्यान किनारपट्टी भागांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक शहरांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या वातावरणीय घडामोडी या उन्हाळ्यातून मान्सूनकडे होणाऱ्या बदलाचे संकेत आहेत. सध्याची स्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्रात १० जूनच्या आसपास मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.